Coronavirus: लसीकरणाचा वेग मंदावल्यास कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागेल, तज्ज्ञांचा इशारा
मुंबई: देशभरात कोरोनाच्या आलेल्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे देशातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. अशातच राज्याला पुरेशा लसीचा पुरवठा होत नसल्याने 1 मे पासून होणाऱ्या व्यापक लसीकरणाच्या मोहिमेमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. राज्यातील लसीकरणाचा वेग मंदावल्यास राज्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागेल असा इशारा काही तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे राज्यासमोरील चिंतेत वाढ झाली आहे.
राज्यात 1 मे पासून 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार होते. पण लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या आणि मृत्यू हे महाराष्ट्रात आहेत. त्यावर नियंत्रण ठेवायचं असेल तर सर्वांचं लसीकरण हाच पर्याय आहे. अशात लसीकरणाचा वेग मंदावल्यास कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊन तिसऱ्या लाटेला सामोरं जावं लागणार आहे असं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.