अखेर पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाहीच.
बीडमधून 2019 मधील आमदारकीच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर नंतर पंकजा मुंडे यांना राजकीय पुनर्वसनाची अपेक्षा आहे. याआधीही राज्यसभेसाठी त्यांचं नाव चर्चेत होतं. मात्र तेव्हाही पंकजांना संधी देण्यात आली नाही. महाराष्ट्रातील विविध राजकीय कार्यक्रमांमधूनही पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्याचं चित्र दिसत होतं. मुंबईत झालेला ओबीसी आरक्षणासाठीचा मोर्चा, औरंगाबादेतला जलाक्रोश मोर्चा या नुकत्याच झालेल्या मोठ्या दोन भाजपच्या इव्हेंटमधूनही पंकजांची गैरहजेरी ठळकपणे दिसून आली. ओबीसी नेत्या असूनही त्या इथे सक्रिय दिसल्या नाहीत. याउलट भाजपचे राष्ट्रीय सचिवपद दिल्याने राष्ट्रीय पातळीवर राजकारणात त्या दिसून येत आहेत. आता विधान परिषदेच्या निमित्ताने तरी महाराष्ट्रातील राजकारणाशी त्यांचा थेट संबंध येईल, अशी अपेक्षा पंकजांच्या समर्थकांना होती. मुख्य म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या नावाला समर्थन दिलं होतं. मात्र, ती अपेक्षा पूर्ण न झाल्यानं नाराजी व्यक्त केली जात आहे.