*मुंडे भगिनींच्या कामाचे श्रेय घेणाऱ्या पालकमंत्र्यांनी राज्य सरकारकडून फुटकी कवडी तरी आणली का? भाजप तालुकाध्यक्ष सतीश मुंडे*
प्रतिनिधी:- दिपक गित्ते
परळी —- पंकजाताई मुंडे आणि खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची पालकमंत्र्यांची जुनीच सवय आहे. आताही त्यांनी तेच केले आहे, त्यांच्या कामाचे श्रेय घेणाऱ्या पालकमंत्र्यांनी राज्य सरकारकडून फुटकी कवडी तरी आणली का? अशी टिका भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे यांनी केली आहे.
परळी – गंगाखेड रस्त्यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी प्रयत्न करून २२४ कोटी रूपये आणले, याशिवाय बीड शहरातून जाणाऱ्या व जिल्हयातील इतर रस्त्याकरिता देखील मोठा निधी आणला. यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी सातत्याने पाठपुरावा केला होता. गडकरी यांनी त्यांच्या प्रयत्नांना पाठबळ देत हा निधी मंजूर केला. केंद्रात भाजपचे सरकार आहे, जिल्हयाचा खासदार भाजपचा आहे, दिलेला निधी केंद्र सरकारचा आहे असे असताना पालकमंत्र्यांनी फुकटचे श्रेय लाटू नये. पंकजाताई मुंडे यांनी सत्तेत असताना परळी मतदारसंघात व जिल्हयात मोठया प्रमाणात निधी आणला होता व त्याच निधीतून आताही कामे चालू आहेत. परंतू पालकमंत्री मात्र आपणच हे सर्व केल्याची नाटके करत आहेत. खरचं तुमच्यामध्ये विकासाची एवढी तळमळ आहे तर मग राज्य सरकारकडून आपण सत्तेत आल्यानंतर किती निधी आणला ? हे जनतेला सांगावे असे आव्हान तालुकाध्यक्ष सतीश मुंडे यांनी केले आहे.