• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

शेतकऱ्यांनी संघटित होत आंदोलन करावे : हभप श्यामसुंदर सोन्नर महाराज

ByND NEWS INIDIA

Mar 10, 2023

शेतकऱ्यांनी संघटित होत आंदोलन करावे : हभप श्यामसुंदर सोन्नर महाराज

परळी / प्रतिनिधी

हक्क व न्याय मागणाऱ्यांना इथल्या व्यवस्थेने नेहमीच कोरडे ओढले असल्याचा इतिहास अनादी काळापासून आहे. मात्र, आता शेतकऱ्यांनी संघटितपणे व विचारपूर्वक आंदोलन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन हभप श्यामसुंदर महाराज सोन्नर यांनी केले.परळी व धारूर तालुक्यातील 14 गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत जगतगुरू संत तुकाराम महाराज बीज निमित्ताने कान्नापूर येथील शेतकरी कीर्तन महोत्सवात आयोजित काल्याच्या कीर्तनात ते बोलत होते.

परळी आणि धारूर तालुक्यातील कान्नापूर व आसपासच्या १४ गावांनी मिळून जगद्गुरू संत तुकाराम बीजाचे औचित्य साधत शेतकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन कान्नापूर येथे केले होते.गुरुवार दि 9 रोजी संपन्न झालेल्या काल्याच्या कीर्तनात श्यामसुंदर महाराज म्हणाले, नैतिकता सदविचार, आचार, आत्मविश्वास, भूतदया, शेती आणि पर्यावरण संवर्धनाचा आदर्श वस्तुपाठ सर्वच संतांनी आपल्या आचरणातून घालून दिलेला आहे. शेतकऱ्यांना नेते नाहीत म्हणून अनेक अडचणी आहेत. शेतकऱ्यांच्या घामाने व कष्टाने तयार केलेल्या उत्पन्नावर फक्त शेतकऱ्यांचा अधिकार आहे. शेतीतील पिकांना जो हमीभाव मिळत आहे, तो पाहता आगामी काळात शेतकऱ्यांनी आपली एक विशिष्ट नीती ठरवून शेती केल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. सार्वजनिक व्यवस्थेवर सर्वांचा समान अधिकार असला पाहिजे, असे श्यामसुंदर महाराज म्हणाले.

या कीर्तन महोत्सवात मोहा, कान्नापूर, म्हातारगाव, आमला,करेवाडी, देवठाणा, मुंगी, गडदेवाडी, वाघाळा, कावळ्याची वाडी, सरफराजपूर, बोधेगाव व वंजारवाडी या चौदा गावांतील शेतकरी व ग्रामस्थांनी उपस्थिती लावली होती. प्रत्येकाने घरून येताना आणलेली भाजी-भाकरी एकत्रित करून सर्वांनी एकत्र बसून जेवणाच्या पंगती करणे, हे या कीर्तन महोत्सवाचे विशेष वैशिष्ट्य ठरले. भुकेला, शेतकऱ्यांना व वारकऱ्यांना जात नसते हेच या माध्यमातून आम्हाला दाखवायचे होते, असे संयोजक कॉग्रेड अँड. अजय बुरांडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त करताना सांगितले.