अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे भिडणार; राहुल गांधींच्या सभेत गनिमी काव्याने घुसणार
सविस्तर वृत्त :✍️
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. या मुद्द्यावरून राज ठाकरे यांचा मनसे पक्षही आक्रमक झाला असून उद्या शेगाव येथे होणारी राहुल गांधी यांची सभा उधळून लावणार असल्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. ही सभा उधळण्यासाठी मनसे गनिमी काव्याने शेगावमधील सभेत घुसणार असल्याचं मनसे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.
मी तुमचा नोकर होऊन राहण्यास तयार आहे, असं म्हणत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रजांकडे माफीनामा सादर केल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. राहुल गांधी यांच्या याच वक्तव्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातील शेगाव येथे पोहोचली आहे. शेगाव येथे काँग्रेसकडून भव्य सभेचे आयोजन करण्यात आलं आहे. मात्र यापुढे राहुल गांधी पुन्हा कधी महाराष्ट्रात सभा घेणार नाही असा धडा शिकवू, असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना संदीप देशपांडे यांनी सांगितले की, अविनाश जाधव यांनी अनेक भाई लोकांची भाईगिरी उतरवली आहे. आता पप्पूची पप्पूगिरी उतरवण्यासाठी आम्ही एकत्र चाललो आहे. नक्कीच त्याची पप्पूगिरी पण उतरवली जाईल, असा इशारा यावेळी संदीप देशपांडे यांनी दिला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या लोकांना महाराष्ट्रातील लोक जाऊन मिठ्या मारतात अशा सगळ्यांना उद्या चोख उत्तर मनसेकडून मिळणार असल्याचं मनसेकडून सांगण्यात आलं आहे.