विकासकामांसाठी आलेले करोडो रुपये पाण्यातच गेले – अश्विन मोगरकर
ND NEWS | परळी वैजनाथ
परतीच्या पावसाने परळी शहरातील मोंढा मार्केट भागात पाणीच पाणी झाले असून नगर परिषदेने रस्ते व नाल्यांचे बोगस कामे केल्यामुळे विकासकामांसाठी आलेले करोडो रुपये पाण्यातच गेले असल्याचा आरोप भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी केला आहे.
परळी शहरातील महत्वाचा भाग असलेला मोंढा मार्केट भागात बुधवार दि 12 ऑक्टोबर ला दुपारी आलेल्या पावसाच्या जोरदार सडाक्यामुळे पाणीच पाणी झाले होते. नाली वर आणि रस्ते खाली अश्या पद्धतीने बांधकाम झालेल्या मोंढ्यातील रस्तावरून चक्क नदीच वहात असल्याचा भास होत होता. दुकानांच्या चौकटिपर्यंत पाणी पोचले होते. यामुळे दुकानदारांची धावपळ उडाली होती. नगरपरिषदेला कर भरणारे व्यापारी पावसाच्या साठलेल्या पाण्याने त्रस्त असताना प्रशासक असलेले मुख्याधिकारी व इतर अधिकारी मात्र आपल्या कार्यालयातून बाहेर पडण्यास सुद्धा तयार नाहीत. शहरात नगरपरिषदेत नगर रचनाकार आहे का असा प्रश्न पडावा अशी रस्ते व नाल्यांची बोगस कामे झाली आहेत असा आरोप भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी केला आहे. पावसाचे पाणी नालीत न जाता रस्त्यावरूनच वहात आहे. कुठे रस्ता खाली नाली वर तर कुठे नालीचा पत्ताच नाही अशी कामे झाल्यामुळे पावसाचे पाणी दुकानात शिरत आहे. प्रशासक म्हणून सर्वाधिकार असलेल्या मुख्याधिकारी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शहरात फेरफटका मारल्याचे दिसून येत नाहीत. यामुळे कर्मचारी वर्गावर कुठलाही धाक नाही यामुळे शहरात नागरिक व व्यापाऱ्यांना होत असल्याच्या त्रासाला पारावर उरलेला नाही. शहरात स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत. नाल्या वेळेवर काढल्या जात नाहीत तर कधी काढलेला गाळ उचलला जात नाही. यामुळे दुर्गंधी पसरून डासांचा प्रचंड प्रमाणात उच्छाद वाढला आहे. मलेरिया, डेंगू व साथीच्या आजाराने नागरिक त्रस्त आहेत. धूर फवारणी, औषध फवारणी पूर्णपणे बंद आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष द्यायला नगर परिषद प्रशासनाकडे वेळ नाही.
प्रशासक असलेल्या मुख्याधिकाऱ्यांनी शहरात फिरून नागरिकांच्या समस्या त्वरित जाणून घ्याव्यात व शहरातील नित्कृष्ठ व चुकीच्या झालेल्या रस्ते व नाल्याची कामे दुरुस्त करून व्यापारी व नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी केली आहे.