शिक्षक उचलतात फुकट पगारी; शिक्षणाच्या नावाने मात्र बोंबाबोंब
ND NEWS | :
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते जर माणूस पिला तर तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. असे म्हटले जाते. परंतु पवित्र अशा शिक्षण क्षेत्राला बदनाम करण्याचा घाट काही शाळा घालत असल्याचा प्रकार परळी शहरात उघडकीस आला आहे. परळी शहरात पंचायत समिती पासून हाकेच्या अंतरावर असलेले छत्रपती संभाजी विद्यालय हे फक्त झेंडावंदनासाठीच उघडते एरवी ही शाळा बंदच असते.मग ही शाळा नेमकी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आहे की फक्त झेंडा फडकवण्यासाठीच असा प्रश्न या निमित्ताने उभा टाकला आहे.याप्रकरणी वरिष्ठांनी लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शासन शिक्षणासाठी कोट्यावधी रुपये खर्च करत आहे.शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा यासाठी विविध योजनाही विद्यार्थ्याकरिता राबविण्यात येतात. परंतु कोट्यावधी रुपये खर्चून जर विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नसेल किंवा शाळा ह्या फक्त कागदोपत्रीच सुरू असतील तर मग अशा शाळांची गरजच काय? प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. परळी शहरात छत्रपती संभाजी विद्यालयात शिक्षणाच्या नावाखाली शासनाच्या लाखो रुपयांचा चुराडा होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. ही शाळा गेल्या अनेक वर्षापासून कागदपत्री सुरू असल्याचे दिसुन येते. ना विद्यार्थी, ना शिक्षण शाळेच्या परिसरात अस्वच्छता कचऱ्याचे ढीग अशी बकाल अवस्था या शाळेची झाली आहे. ज्ञानदानाचे कुठले पवित्र कार्य न करता शिक्षकांच्या पगारी मात्र सुरु असल्याचे समजते. सदरील विद्यालयात विद्यार्थीच नसल्याने ही शाळा केवळ कागदावरच चालते.15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 17 सप्टेंबर व 1 मे या दिवशी मात्र झेंडावंदनासाठी या शाळेत शिक्षक येतात तेव्हाच ही शाळा उघडते एरवी ही शाळा बंदच असते. यामुळे शाळेची घंटी परिसरातील कुणाच्याही कानावर कधी आलीच नाही.
@@@@@@
योग्य ती कारवाई करू- सोनवणे
छत्रपती संभाजी विद्यालयाच्या गलथान कारभाराविषयी परळी येथील प्रभारी गट शिक्षणाधिकारी नवनाथ सोनवणे यांना विचारले असता या प्रकरणी केंद्रप्रमुख यांचा अहवाल प्राप्त होताच योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगितले.