कोरोना संकटात राज्य सरकारच्या मदतीसाठी बीड जिल्हा युवक काँग्रेसचा पुढाकार.
नोंदणीपासून लस मिळेपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेत काँग्रेस कार्यकर्ते लोकांना मदत करणार.
गेवराई, दि. १ मे २०२१
राज्यासमोर आर्थिक संकट असतानाही १८ वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने हाती घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला हातभार लावण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या शेजारच्या गोरगरिब कुटुंबांना दत्तक घेऊन स्वतःचा व त्या कुटुंबांच्या लसीकरणाचा खर्च उचलून ती रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करावा, असे आवाहन बीड जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड.श्रीनिवास बेदरे यांनी केले आहे.
यावेळी बोलताना ॲड.श्रीनिवास बेदरे म्हणाले की, कोरोना हे देशावर आणि राज्यावर आलेले अभूतपूर्व संकट आहे. दररोज होणाऱ्या मृत्यूंची संख्या पहावत नाही. या संकटाचा सामना महाराष्ट्र विकास आघाडी सरकार वर्षभरापासून मोठ्या धैर्याने करत असून केंद्र सरकारने आपली जबाबदारी झटकली असली तरी महाराष्ट्र सरकारने मात्र जनतेला वाऱ्यावर न सोडता १८ वर्षावरील सर्वांच्या मोफत लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. परंतु राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता मदतीचा ओघ वाढला पाहिजे.तसेच जिल्ह्यात कोविड सहायता केंद्राची स्थापना करून गरजू रुग्णांना बेड्स मिळवून देणे, वैद्यकीय सहायता पुरवणे याबरोबरच मदतीचे कार्य सुरु ठेवले आहे. लसीकरणाचा खर्च मोठा आहे त्याला हातभार म्हणून बीड जिल्हयातील काँग्रेस कार्यकर्ते आपल्या परिसरातील गरीब कुटुंबांना दत्तक घेऊन स्वतःच्या व त्या कुटुंबाच्या लसीकरणाचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहेत. या सोबतच नोंदणी करून लस मिळेपर्यंतच्या पूर्ण प्रक्रियेत काँग्रेस कार्यकर्ते लोकांना मदत करणार आहेत.
केंद्रातील मोदी सरकारने कोरोनाची परिस्थिती अत्यंत निष्काळजीपणे हाताळली, सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे देशाची झालेली स्थिती पाहून सुप्रीम कोर्टानेही, “देशाच्या जनतेला मरायला सोडलं आहे का”?, असा संतप्त सवाल केला. अनेक गावं स्मशान झाल्याचे विदारक चित्र दिसत आहे. आतापर्यंत मोठे नुकसान झाले आहे. सध्यातरी लसीकरण हाच यावरील प्रभावी उपाय ठरत आहे. पण केंद्र सरकारने आपल्या देशातील लस दुसऱ्या देशांना पाठवली. ज्या पाकिस्तानला नेहमी शिव्या देता त्यांनाही ४.५ कोटी लसी दिल्या. एवढा बेजबाबदार पंतप्रधान जगात आतापर्यंत कुठेच झाला नाही, असेही ॲड.श्रीनिवास बेदरे म्हणाले.