बेलगांव/केळगांव येथे सव्वाशे विहिरींची कामे न करताच उचलली बिले,सामाजिक कार्यकर्ता आझाद मैदानावर करणार आमरण उपोषण
हनुमंत गव्हाणे :ND NEWS |केज
तालुक्यातील बेलगांव/केळगांव येथे मंजूर झालेल्या विहीरी व रस्ते यांची कामे न करताच निधी लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते प्रताप दातार यांनी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांना निवेदन दिले असून २८ फेब्रुवारी रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर अमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले आहे.
केज तालुक्यामधील बेलगाव/ केळगाव ग्रामपंचायत हद्दीत २०१० ते २०२० दरम्यानच्या कार्यकाळात रोजगार हमी योजने अंतर्गत कोट्यावधी रूपयांचा निधी गावाच्या विकासासाठी शासनाकडून आला. मात्र प्रत्यक्षात विकासाची कामे झालेली नसल्याची बाब समोर आली आहे. साधारणतः दीड हजार लोकवस्ती असलेली बेलगाव/केळगाव ही ग्रुप ग्रामपंचायत आहे. येथे शासनाने मागील काळात अनेक विकासात्मक योजना राबविलेल्या आहेत. परंतु कामे न करताच संबंधीत यंत्रणेने निधी लाटला असल्याची तक्रार बीड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आली आहे. संबंधीत कामे पूर्णच झालेली नाहीत मग काम पूर्ण झाल्याचे ‘वर्कशिट कसे? असा सवाल तक्रारदार यांनी उपस्थित केला आहे.
या रस्त्यांच्या कामात झाला भ्रष्टाचार
१ तक्रारदार प्रताप दातार यांनी जिल्हाधिकारी, बीड यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बेलगाव / केळगाव ग्रामपंचायत हद्दीत रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या खालील रस्त्यांच्या कामात मोठ्याप्रमाणात अफरातफर झालेली आहे. यामध्ये बेलगाव ते चौरे वरती रस्ता, बोबाटी नदी ते चौरेवस्ती, बेलगाव नदी ते काळेगाव घाट, बेळगाव ते घुले वस्ती, तिरुका ते एकुरका शिव रस्ता, बेलगाव ते माळेवाडी रोड, बेलगाव ते काळेगाव घाट, बेलगाव ते माळेवाडी शिव, माळेवाडी ते एकुरका शिव, चिवडीचा नाला ते बेलगाव रोड यासह इतर आठ ते दहा रस्त्यांचा बोगस कारभार झालेला आहे.
२ आमच्या गावात वैयक्तीक लाभाच्या विहीरी व सार्वजनिक रस्त्यांची मोठ्या प्रमाणात कामे रोहगार हमी योजने अंतर्गत झालेली असल्याचे कागदोपत्री दाखविलेले आहे. परंतु प्रत्यक्षात कुठलीच कामे झालेली नाहीत. ही बाब मी पुराव्यासह बीडच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांच्याकडे सादर केलेली •आहे. माझ्या तक्रारीवर तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याची मी मागणी केली असल्याचे सांगत सामाजिक कार्यकर्ते प्रताप दातार यानी म्हटले आहे की, तक्रारीची दखल घेतली नाही तर २८ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर अमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.