*जलालपूर ते बायपास रोडला झाड झुडप्यांनी घेरलं; महाशिवरात्री पूर्वी पालखी मार्गावरील झाड व झुडपे तोडावीत—अँड.मनोज संकाये*
*नाथ चित्रमंदिर ते वैद्यनाथ रोडवरील पथदिवे त्वरित चालू करावीत*
परळी वैजनाथ प्रतिनिधी
जलालपुर व बायपास या पालखी मार्गावरील रोडवर आलेली झाडे व झुडपे महाशिवरात्रीपूर्वी तोडावीत. हा मार्गावर झाड व झुडपांनी अक्षरशः घेरला गेला असून प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन पालखी मार्ग भाविकांसाठी खुला करून द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अँड.मनोज संकाये यांनी केली आहे.
हा मार्ग पालखी मार्ग असून याच मार्गावरून जिरेवाडी येथील प्रभू सोमेश्वर महाराजांची पालखी महाशिवरात्री दिवशी वैद्यनाथ मंदिर कडे जात असते. या मार्गावर झाड व झुडपांचे प्रमाण वाढले असून या मार्गावर वेड्या बाभळीची झाडे मोठ्या प्रमाणावर रोडवर आली आहेत त्यामुळे अनेक अपघात होत आहेत. याच मार्गावरून शाळेकडे जात असताना एका शिक्षकाचा गंभीर अपघात झाला. या अपघातामध्ये संबंधित शिक्षकाचा पाय मोडला आहे तसेच जलालपूर शेजारील नदी च्या ठिकाणी असलेले वळण धोकेदायक ठरत आहे. या वळणावर जिरेवाडी कडे जाताना किंवा परळीकडे येताना बाभळीची झाडे असल्यामुळे समोरचे वाहन दिसत नाही त्यामुळे अनेक अपघात त्या ठिकाणी होत आहेत.
दरम्यान नाथ चित्रमंदिर ते प्रभू वैजनाथ मंदिर कडे जाणारा मुख्य रस्ता या रस्त्यावर लावण्यात आलेल्या पथदिव्यापैकी काही पोलवरील पथदिवे (लाईट)बंद आहेत तसेच आजाद चौक ते वैद्यनाथ मंदिर कडे जाणाऱ्या रोडवरील काही पोलवरील पथदिवे बंद आहेत.त्यामुळे रात्री या मार्गावर अंधार पसरू लागलेला आहे.
महाशिवरात्र जवळ येत आहे. महाशिवरात्री साठी राज्यातील बाहेर राज्यातील आणि परिसरातील भाविक भक्त प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने परळी नगरीत येतात. त्यामुळे या पालखी मार्गावरील सर्व झाड व झुडपे तोडावीत आणि नाथ चित्रमंदिर ते वैद्यनाथ मंदिर रोडवरील पथदिवे चालू करावीत या विषयाची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी संबंधित प्रशासनाकडे केली आहे.