बंजारा समाजाच्या मदतीला धावून आले युवक नेते माणिक भाऊ फड
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)…
तालुक्यातील कन्हेरवाडी परिसरातील जांभूळदरा तांड्यावरील रस्ता परतीच्या पावसाने झालेल्या अतिवृष्टी मध्ये वाहून गेल्याने या परिसरातील शेतकरी व मुख्यत्वे तांड्यावरील नागरिकांना रहदारीसाठी पर्यायी रस्ताच उपलब्ध नसल्याचे लक्षात येताच कन्हेरवाडी येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते तथा युवक नेते माणिकभाऊ फड यांनी शेतकरी तसेच बंजारा समाजाच्या मदतीला धावून येत स्वखर्चाने रस्ता दुरुस्ती करून जांभूळदरा तांड्यावरील नागरिकांच्या दळणवळणाचा जिव्हाळ्याचा प्रश्न मिटवला असून बंजारा समाजाच्या वतीने माणिक भाऊ फड यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.
याबाबत माहिती अशी की, परतीच्या पावसाने मराठवाड्यात सर्वत्र धुमाकूळ घातला होता. बीड जिल्ह्यामध्ये देखील अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झाले. परतीच्या पावसामुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन ग्रामीण भागामध्ये वाड्या, वस्त्या व तांड्यावरील रस्त्यांचे देखील अतोनात नुकसान झाले होते. याच परतीच्या पावसामुळे परळी तालुक्यातील कन्हेरवाडी परिसरातील जांभूळदरा तांड्यावर जाणारा रस्ता वाहून गेला होता. रस्ता नादुरुस्त झाल्याकारणाने कनेरवाडी परिसरातील शेतकरी नागरिक तसेच बंजारा समाजाचा दळणवळणाचा तसेच व्यवसायाचा प्रश्न गंभीर झाला होता. शासन दरबारी हेलपाटे मारून झाले तरी कुठलीही शासकीय मदत न मिळाल्याचे लक्षात येताच बंजारा समाजाच्या मदतीला कन्हेरवाडी येथील युवक नेते तथा सामाजिक कार्यकर्ते माणिक भाऊ फड धावुन आले. सदैव सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या माणिक भाऊ फड यांनी बंजारा समाजाच्या हाकेला ओ देत स्वखर्चाने या रस्त्याची दुरुस्ती करून तांड्यावरील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मिटवला आहे. हा रस्ता दुरुस्त झाल्याने शिवारातील शेतकरी व नागरिकांचा दळणवळण तसेच रहदारीचा प्रश्न मिटल्याने बंजारा समाजाच्या वतीने नागरिकांतून युवक नेते तथा सामाजिक कार्यकर्ते माणिक भाऊ फड यांचे सर्व स्तरातून आभार व्यक्त केले जात आहेत. आपणही समाजाचे काही देणे लागतो ही भावना अंगीकारत यापूर्वीही सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या माणिक भाऊ फड यांनी कन्हेरवाडी परिसरातील कन्हेरवाडी देव्हाडा नंदागौळ या रस्त्यावरील पुलाची स्वखर्चाने दुरुस्ती केल्याचे परिसरातील नागरिकांच्या वतीने सांगण्यात आले.