• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

अजित पवारांनी शिल्लक ऊसाला मदत जाहीर करायची सोडून  फक्त टिकाच केली

ByDeepak Gitte

Apr 8, 2022

सोयाबीन, ऊस मित्र मेळाव्यात पंकजाताई मुंडेंनी घेतला समाचार

शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करावी असं वातावरण निर्माण व्हावं*

सोयाबीन, ऊसासाठी शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरू

प्रतिनिधी:- दिपक गित्ते

अंबाजोगाई  ।दिनांक ०८।
अजित पवार राज्याचे अर्थमंत्री आहेत, वाटलं होतं जिल्हयात येऊन शिल्लक  ऊसाला तसेच  इथल्या शेतकऱ्यांना काहीतरी अनुदान, मदत जाहीर करतील. पण, तसं काही झालं नाही, फक्त त्यांनी टिकाच केली. शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडलं नाही, त्यांची घोर निराशा झाली. सरकार म्हणून  जे बोलता ते करून दाखवा , उगाच गप्पा मारू नका अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी समाचार घेतला.

जागृती व्यवसाय मंचच्या वतीने शहरातील मुकूंदराज सांस्कृतिक सभागृहात आयोजित सोयाबीन, ऊस मित्र मेळाव्यात त्या बोलत होत्या. आ. नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा, भाजपचे तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

अर्थमंत्री अजित पवार आज जिल्हयात येऊन गेले, ते इथं येऊन चांगलं बोलतील, शेतकऱ्यांच्या शिल्लक ऊसाला मदत, काहीतरी अनुदान जाहीर करतील. सुतगिरणी बुडविणारे त्यांच्या व्यासपीठावर होते, त्याबद्दलही बोलतील  असं वाटलं होतं पण तसं झालं नाही. खासदारांवर रस्त्यावरून त्यांनी टिका केली पण त्यांना हे माहित नाही की जिल्हयात अकरा राष्ट्रीय महामार्ग आम्ही आणले, अनेक छोटे, मोठे रस्ते जे तुमच्या काळात झाले नाहीत ते केले. एवढेच काय तुमच्या बारामतीचा रस्ता देखील केंद्र सरकारच्या निधीतून झाला, नीट अभ्यास करून जिल्हयात येत जा असे पंकजाताई मुंडे म्हणाल्या.

आधुनिक शेतीची कास धरा
भाजप हा मुठभर लोकांचा पक्ष आहे शेतकरी, शेतमजुरांचा नाही अशी टिका काॅग्रेसवाले करत होते पण शेतकऱ्यांसाठी खरे काम भाजपाने केले आहे. कर्जमाफीच्या मोर्चाची  आठवण नेहमी येते. शेतीला उद्योगाचा दर्जा देण्याचे काम अटलजी पंतप्रधान असताना झाले, लोकनेते मुंडे साहेबांनी तसा प्रस्ताव मांडला होता. पिक विमा सुध्दा त्यांनीच दिला. आज शेतकरी खुश आहेत. आपल्या भागाचे मागासलेपण घालवायचे असेल तर शेतीवर आधारित उद्योग आले पाहिजेत. शेतीकडे कनिष्ठ दर्जा पाहणे सोडून दिले पाहिजे. शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करावी असं वातावरण निर्माण व्हावे असे पंकजाताई म्हणाल्या.

एकेकाळी देशात गरीबी होती. अन्नासाठी संघर्ष होता. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावरच स्थिती बंदलली. आता तशी परिस्थिती नाही असे सांगून  आधुनिक जगात शेतीचं स्थान आणि हमी भावावर चर्चा होतेय, ती झाली पाहिजे असं त्या म्हणाल्या.

मी शेतकऱ्यांसोबत..
सोयाबीन, ऊसासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज असून मी शेतकऱ्यांसोबत आहे. सोयाबीनचा भाव प्रति क्विंटल साडे सात हजार आहे, पण अजून वाढून दहा हजारापर्यंत व्हावा. एकेकाळी तीन हजारासाठी आम्ही आंदोलने केली  पण आज तो वाढला. मी कारखानदार आहे पण शेतकऱ्यांच्या बाजूने आहे.  ऊसासाठी केंद्रीय सहकार मंत्री  अमित शहांना भेटणार आहे.
सोयाबीन, ऊस हे नगदी पीक आहेत. मराठवाडयात सिंचनाच्या सोयी झाल्या पाहिजेत असं त्या म्हणाल्या. सध्या वीज कट केली जात आहे, सरकारने असं करू नये. जे बोललं ते करून दाखवा उगाच गप्पा मारू नका असं सांगून
शेतकऱ्यांना अधिक ताकदवर करण्यासाठी काम केलं पाहिजे. तालुक्यात असे मेळावे व्हावेत.
काहीतरी चागलं काम झालं पाहिजे. केवळ आरोपाचे राजकारण नको असं पंकजाताई म्हणाल्या.

या मेळाव्यात आधुनिक शेतीचा प्रयोग करत उत्पादन घेणाऱ्या परळी व अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांचा पंकजाताईंच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.