राखेची वाहतूक करणाऱ्या हायवा चालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू ; ग्रामीण पोलिसात अद्यापही गुन्हा दाखल नाही !
परळी (प्रतिनिधी)
परळी-गंगाखेड रोडवर असलेल्या राखेच्या तळ्याच्या जवळच राख साठवलेल्या ठिकाणी एका राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात अद्यापही गुन्हा दाखल न झाल्यामुळे यामध्ये काय गौडबंगाल आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
परळी ग्रामीण हद्दीत अवैध राख वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असून याकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे राखेच्या उघड्या व अवैध वाहतुकीमुळे अनेक अपघात होत असून अनेक लोकांचे नाहक बळी गेलेले आहेत. दिनांक 23 मार्च 2022 रोजी दाऊतपुर शिवारातील राखेच्या तळ्या नजीक टिप्पर चालक बाबुराव पैठने यांचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अद्यापही परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नाही. यामागे काय गौडबंगाल आहे असा प्रश्न निर्माण होत आहे. जर पोलिस केवळ चिरीमिरी घेण्यासाठी मूग गिळून गप्प बसत असतील तर सर्वसामान्य जनतेने दाद मागावी कुणाकडे असाही प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान काही पत्रकार बांधव सदरील घटनेची माहिती घेण्यासाठी दिनांक 24 मार्च रोजी रात्री आठ वाजता ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि मारुती मुंडे यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांनीही पञकारा यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जर पोलीस प्रशासनातील जबाबदार अधिकारी माहिती देणे टाळत असतील तर ही अत्यंत खेदजनक बाब आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून दोषींवर योग्य ती कारवाई करावी.व मयतास न्याय मिळवुन द्यावा अशीही मागणी जनतेतुन होत आहे.