परळी (दि. ०७) —- : बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली असून, मंगळवारी एकाच दिवसात हे आकडे ७०० च्या पार गेलेले पाहायला मिळाले. दिवसागणिक वाढणारे हे आकडे चिंताजनक असून याकडे गांभीर्याने पाहण्याची व नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध घातले आहेत. लसीकरणासाठी पात्र असलेल्या नागरिकांनी लवकरात लवकरात लसीकरण करून घ्यावे; ज्यांनी लसीचे पहिले डोस घेऊन विहित वेळ पूर्ण केली आहे, त्यांनी लसीचे दुसरे डोस घ्यावेत असे आवाहन जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून ना. धनंजय मुंडे यांनी केले आहे.