• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

जग कितीही आधुनिक होऊ द्या कुणब्याशिवाय ते शून्य आहे- डॉ. बालाजी जाधव

14 गावच्या भाकरीची पंगत; शेतकरी कीर्तन महोत्सवात क्रांतीकारक विचारांची रंगत

जग कितीही आधुनिक होऊ द्या कुणब्याशिवाय ते शून्य आहे- डॉ. बालाजी जाधव

14 गावच्या भाकरीची पंगत; शेतकरी कीर्तन महोत्सवात क्रांतीकारक विचारांची रंगत

ND NEWS |

जग कितीही आधुनिक होऊ द्या कुणब्याशिवाय ते शून्य आहे. कलेक्टर शिवाय या देशाची व्यवस्था चालू शकते. प्रधानमंत्र्या शिवाय चालू शकते. मंत्र्याशिवाय चालू शकते. अधिकाऱ्याशिवाय चालू शकते. पण या देशामधला कुणबी म्हणजेच शेतकरी असा घटक आहे. त्याच्या शिवाय या देशाचं पान सुद्धा हलत नाही. एवढी मोठी ताकद शेतकऱ्याची आहे आणि ही ताकद शेतकऱ्यांनी समजून घेतली पाहिजे..शेतकऱ्यांनी जागृत झाले पाहिजे असे प्रतिपादन डॉ.बालाजी जाधव यांनी केले.धारूर तालुक्यातील कान्नापूर येथे आयोजित केलेल्या शेतकरी कीर्तन महोत्सवात ते बोलत होते.

बरे देवा कुणबी केलो!
नाही तर असतो दंभेची मेलो !!
या जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगावर प्रवचन करताना डॉ. बालाजी जाधव म्हणाले की, कधीतरी इडीवाल्याना पाठवा आमच्या शेतकऱ्याकडे पाचशे दहा किलोचा कांदा विकल्यानंतर दोन रुपये घरी घेऊन जाताना कसं वाटतं. पाठवा इडी वाल्यांना. याची कुठेतरी नोंद करा गिनीजबुकात. पाचशे दहा किलो कांदा विकला तर दोन रुपये मिळतात. एवढी करप्ट व्यवस्था या देशात निर्माण झाली आहे. शेतकरी कीर्तन महोत्सव सुरू असताना हाच अभंग निवडायचे कारण काय? ज्या व्यवस्थेमध्ये कुणब्यांना शेतकऱ्यांना हीन लेखण्याचं काम केलं गेलं आज जरी ती व्यवस्था नसली तरी त्यापेक्षा डेंजर व्यवस्था आज आहे. कारण भांडवलशाही सोबत हात मिळवणी केली आहे. त्यामुळे कोणाचेही सत्ता येऊ द्या व्यवस्था तिच राहणार आहे. शेतकरी वर येऊच नये अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण केली गेली आहे. जर शेतकऱ्याने स्वतः पुरतच पिकवायचं ठरवलं तर भांडवलदार यांची काय अवस्था होईल.

एका दाण्याचे 100 दाणे करणारा कुणबी ताकद विसरला त्याची जाणीव संत तुकाराम महाराजांनी करून दिली. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात बरे झाले देवा मला तू कुणबी केलास आणि खालच्या जातीत जन्माला घातलेस नाही तर जर उच्चकुळात जन्माला आलो असतो तर उगीच अभिमानाने आणि दंभाने मेलो असतो. तात्कालीन व्यवस्थेला संत तुकाराम महाराजांनी हिणवलं व झुकवलं. आज तुकारामांचा, नामदेवांचा, ज्ञानेश्वरांचा आदर्श घेऊन या व्यवस्थेला झुकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आपण कुणबी आहोत हे कधीच विसरू नका. कुणबी म्हणजे एक विशिष्ट जात नव्हे. बीज पेरण्यापासून बीज बाजारात विकण्यापर्यंत ज्या ज्या समूहाचे हात लागतात. ते समूह म्हणजे कुणबी. आज भांडवली व्यवस्थतेत सांगायचं म्हटलं तर कुणबी हा एक वर्ग आहे. या समस्त कुणब्यांना,अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करावे लागेल. आपल्या हक्क अधिकारासाठी लढावे लागेल. हेच आपल्याला संत जगद्गुरु तुकाराम महाराज सांगत आहेत. असेही ते म्हणाले.

*शेतकरी कीर्तन महोत्सवातील वारकरी तृप्त*

शेतकरी कीर्तन महोत्सवाने गावा गावातील सामाजिक ऐक्याची भावना बळकट होत आहे. सोमवार 6 मार्च रोजी परळी तालुक्यातील कावळ्याचीवाडी व बोधेगावच्या शेतक-यांनी किर्तन महोत्सवासाठी भाकरी पाठविण्याचा संकल्प केला होता. घराघरात होळीचा सण साजरा होत असताना कीर्तन महोत्सवातल्या वारकऱ्यांसाठी माय माऊल्यांनी पाठविलेल्या पुरण पोळ्यांनी वारकरी तृप्त झाले. महाराष्ट्रामध्ये एक आगळावेगळा संदेश चौदा गावांनी मिळून आयोजित केलेल्या या “शेतकरी कीर्तन महोत्सवाच्या” माध्यमातून जात आहे.

@@@@@@@
*वैचारिक प्रबोधनाची परंपरा पुनर्जीवित*

धारूर तालुक्यातील कान्नापूर येथे ३ मार्चपासून शेतकरी कीर्तन महोत्सवास प्रारंभ झाला आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज बिजेच्या निमित्ताने वैचारिक प्रबोधन व्हावे यासाठी परळी वैजनाथ व धारूर तालुक्यातील 14 गावांनी एकत्रित येऊन भव्य अशा शेतकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. या कीर्तन महोत्सवात देणग्या, पंक्ती, महाराजांची मोठमोठी बिदागी, अन्नदानातील धबकेबाजपणा टाळून एक आदर्श निर्माण केला आहे तर कीर्तनकारांनी प्रवासाचे अंतर लक्षात घेऊन मिळेल ते मानधन स्वीकारण्याचा एक आगळावेगळा पायंडा या कीर्तन महोत्सवात पडला आहे. या कीर्तन महोत्सवात वैचारिक प्रबोधनाची परंपरा पुनर्जीवित होत आहे. शेतकरी कीर्तन महोत्सव एक क्रांतीची पायवाट होत आहे. अशी भावना लोकसहभाग पाहून या कीर्तन महोत्सवाचे समन्वयक ॲड. अजय बुरांडे यांनी व्यक्त केली आहे.