आता अरविंद केजरीवाल, नितीशकुमार, ममता बॅनर्जी आणि शरद पवार ही चार नावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आगामी काळात आव्हान म्हणून उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत या नेत्यांना रोखण्याचे प्रयत्नही सुरु झाले आहेत.
केजरीवालांना कसे रोखणार?
केंद्रात भाजपा सत्तेत असताना दिल्लीत दोन वेळा आपच्या अरविंद केजरीवालांनी कमाल करुन दाखवली आहे. इतकेच नाही तर पंजाबात काँग्रेसच्या संघर्षात आणि भाजपाच्या एनडीएत झालेल्या फाटाफुटीचा फायदा घेत तिथेही केजरीवाल यांच्या आपने सत्ता मिळवली आहे. आता त्यांचे लक्ष गुजरात विधानसभा निवडणुकांकडे आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत आपचे आव्हानही नरेंद्र मोदी आणि भाजपासमोर असेल. अशा स्थितीत दिल्लीत नुकतीच उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर झालेली छापेमारी, दिल्लीत पुढे आलेला मद्य घोटाळा यातून आपला आणि केजरीवाल यांनाही रोखण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे. अशा स्थितीत केजरीवाल किती दिवस भक्कम भूमिका घेऊ शकतील, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
ममता बॅनर्जीही बॅकफूटवर
प. बंगालमध्ये भाजपाला अंगावर घेऊन पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळवलेल्या ममता बॅनर्जी यांची महत्त्वाकांक्षाही पंतप्रधान होण्याची आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधकांचा एकत्रित उमेदवार असावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यानुसार यशवंत सिन्हा यांच्या नावावर शिक्कामोर्तबही करण्यात आले होते. मात्र भाजपाने द्रौपदी मुर्मु यांना उमेदवारी दिल्यानंतर ममता सुरुवातीला बॅकफूटवर गेल्या. त्यानंतर उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाने प. बंगालच्या राज्यपालांनाच उमेदवारी दिली. त्यावेळी मात्र विरोधकांचे नेतृत्व करण्यापासून लांब राहण्याची भूमिका ममता यांनी घेतली. त्यावेळी त्यांची भाजपा नेत्यांसोबत एक गुप्त बैठक झाल्याचीही माहिती समोर आली. याच काळात त्यांच्या मंत्रिमंडळातील नंबर दोनचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्यावर भ्रष्टाचार प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली. प. बंगाल सरकारमधील 16 मंत्री टार्गेटवर असल्याचेही सांगण्यात येत होते. आता दोनच दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केले आहे. यात त्या किती बॅकफूटवर गेल्या आहेत, हे स्ष्ट दिसते आहे. अशा स्थितीत 2024 साली होणाऱ्या निवडणुकीत ममता बॅनर्जी विरोधकांच्या उमेदवाराला पसंती देणार की स्वतंत्र भूमिका बजावणार, यावर बरेच काही ठरणार असे दिसते आहे.
शरद पवारांनाही रोखण्याचा प्रयत्न
राज्यात विरोधकांचे एकत्रीकरण व्हावे, अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. कोणतेही मोठे पद न घेता, पंतप्रधान मोदींना आव्हान देण्याची घोषणा पवारांनी केली आहे. राष्ट्री राजकारणात सगळ्यांशी चांगले संबंध असलेले पवार, या वेळी पंतप्रधान मोदींना आव्हान देण्याच्या भूमिकेत आहेत. मात्र राज्यात नुकतेच झालेल्या सत्तांतराने भाजपाने त्यांच्यासमोरही अडचण उभी करुन ठेवलेली आहे. येत्या काही दिवसांत पवार हे नितीश कुमार यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे आता पवारांना राज्यातच रोखण्यासाठी अमेठीप्रमाणेच बारामती मतदारसंघावर भाजपा जोर लावण्याची शक्यता आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पाठोपाठ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमणही याच महिन्यात बारामतीचा दौरा करणार असल्याचे सांगण्यात येते आहे. अमेठीप्रमाणे बारामतीची जागा जिंकण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल, त्यातबरोबर पवारांना राज्यातच रोखून धरण्याचाही हा डाव असण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत पवार हे आव्हान कसे रोखणार हा मुद्दा महत्त्वाचा असणार आहे.