सुशिल टकले : तालुका प्रतिनिधी
खा. राहुलजी गांधी यांचा १९ जून रोजी वाढदिवस असून या वाढदिवसाचे औचित्य साधून बीड जिल्हा मध्ये ‘संकल्प दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे. कोरोनाचे संकट असल्याने वाढदिवसाला उत्सवी स्वरुप न देता गोरगरिब जनतेला रेशन, अन्नधान्य, औषधे, वैद्यकीय साहित्य वाटप तसेच कोरोनामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकरी कुटुंबांनाही मदत करण्याचा संकल्प काँग्रेसने केला असल्याची माहिती बीड जिल्हा युवक काँग्रेसचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड.श्रीनिवास बेदरे यांनी दिली आहे.
यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना ॲड.बेदरे म्हणाले की, मागील दीड वर्षांपासून देश कोरोना महामारीचा सामना करत आहे. या कोरोनाने शेतकरी, कष्टकरी, कामकरी, हातावरचे पोट असणाऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. उद्योगधंदे, व्यवसाय बंद पडल्याने लाखो बेरोजगार झाले. पंतप्रधानांनी कोरोना काळात जनतेच्या जिवीताशी खेळ केला असून ‘आपली प्रतिमा संवर्धन’ करण्यासाठी इव्हेंटबाजीवरच जास्त लक्ष दिले. कोरोनाने देशात विदारक चित्र असताना राहुलजींचा वाढदिवस उत्सवी पद्धतीने साजरा करणे काँग्रेस विचाराला पटणारे नाही. हे लक्षात घेऊन राहुलजींचा वाढदिवस हा ‘संकल्प दिवस’ म्हणून साजरा केला जाणार आहे.
काँग्रेस नेते व पदाधिकारी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहेत तर पेट्रोल-डिझेल, खाद्यतेल, एलपीजी गॅसच्या महागाईविरोधात महिला काँग्रेस गॅस कार्यालय आणि पेट्रोल पंपासमोर संकल्प करणार आहेत. युवक काँग्रेस/एनएसयुआयचे कार्यकर्ते यावेळी बेरोजगारीविरोधात आंदोलन करून मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करतील. देशाला वाचवायचे असेल तर राहुल गांधी यांच्याशिवाय पर्याय नसून २०२४ साली राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याचा संकल्प या दिवशी केला जाणार आहे, असेही ॲड.बेदरे यांनी सांगितले.